मागील 70 वर्षांपासून सीमाभागात मराठी भाषिक महाराष्ट्रात सामील होण्याबरोबरच मराठी भाषा आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करत असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करत असते.
सीमाभागात मराठी भाषा संपवण्यासाठी प्रशासनाने जणू कंबरच कसली आहे. असे असताना युवा समिती सीमाभागच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी “मराठी सन्मान यात्रे”चे आयोजन केले आहे. या सन्मान यात्रेच्या माध्यमातून त्यांनी सीमा भागातील तरुणांना “चलो रायगड” अशी हाक दिली आणि शेकडो तरूण स्वयंस्फूर्तीने या सन्मान यात्रेत सहभागी झाले. सीमाभागातून या सन्मान यात्रेला भरघोस असा पाठिंबा मिळाला. परंतु मराठी भाषेची कावीळ असलेल्या कानडी प्रशासनाने मात्र आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. शुभम शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जनजागृती तसेच स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा सहभाग पाहून कर्नाटकी पोलिसांनी एक प्रकारे सन्मान यात्रेत बाधा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला. पोलिस प्रशासनाने चक्क मराठी सन्मान यात्रेसाठी रायगडावर रवाना होणाऱ्या वाहनांचे क्रमांक मागणे, वाहनचालकांचे मोबाईल नंबर मागणे अशा प्रकारे कार्यकर्त्यांवर दबावतंत्र वापरून आपला कंड शमवून घेण्याचा प्रयत्न केला.
एरवी बेळगावात मराठी भाषेचा सन्मान किंवा मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून होत असताना जिल्हा प्रशासन मराठी भाषिकांची गळचेपी करीत असते. परंतु ही सन्मान यात्रा महाराष्ट्रात होत असून देखील पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेबद्दल सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परंतु स्वाभिमानी मराठी भाषिक मावळे जुलमी प्रशासनाच्या दडपशाहीला भिक न घालता “मराठी सन्मान यात्रे”साठी बेळगावातून रायगडी रवाना झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta