
बेळगाव : सीमाप्रश्नी सीमावासीय गेली 70 वर्षे लढा देत आहेत. महाराष्ट्रात सामील होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असताना 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र 24 वर्षे लोटली तरी देखील हा खटला अद्याप पटलावर आलेला नाही. सदर खटल्याला गती देण्यासाठी संपूर्ण सीमाभागातून सह्यांची मोहीम राबवून त्याची प्रत सर्वोच्च न्यायालयात सादर करू जेणेकरून न्यायालयाला जागे करता येईल, असे मत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील प्रगतीशील लेखक संघाच्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप भाषणाप्रसंगी ते बोलत होते.
मधुकर भावे यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला असून महाराष्ट्र सरकार सत्ता संघर्षात मश्गुल असून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा सरकारला सोयीस्कररित्या विसर पडला आहे, त्यामुळे सीमावासीयांना आता न्यायालयाशिवाय पर्याय नाही. पण दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील मराठी भाषिक दोन सरन्यायाधीश होऊन गेले तरी देखील सीमाप्रश्न अद्याप पटलावर येऊ शकला नाही ही सीमावासीयांसाठी शोकांतिका असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta