
बेळगाव : दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा व होऊ घातलेल्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन यशस्वी व्हावे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेला महत्त्व दिले पाहिजे, असे विचार निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
पिरनवाडी येथील कर्मवीर विद्यामंदिर येथे बालगोपाळ एस. एस. एल. सी. व्याख्यानमालेचा सांगता समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सुभेदार मेजर मधू पाटील हे होते.
सुरूवातीला मराठी भाषा प्रेरणा मंचचे सदस्य शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला तर मधू पाटील यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सुरूवातीला निवृत्त मुख्याध्यापक बी.बी. पाटील व निवृत्त सुभेदार मेजर पैलवान विठ्ठल पाटील यांच्याहस्ते कुंडितील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना आपल्या भाषणात पाटील म्हणाले, “अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या जीवनात छंद आणि संस्कारालाही तेवढेच. महत्त्व आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम होऊन आपले छंदही जोपासले पाहिजेत.” असे त्यांनी स्पष्ट केले.
या व्याख्यान मालेतील शेवटचे पुष्प विज्ञान विषयाचे शिक्षक जी.एन. तंगणकर यांनी गुंफले. या व्याख्यानात त्यांनी विज्ञान विषयाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बी. व्ही. साळुंखे आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta