खानापूर : मुसळधार पाऊस सुरू झाला की, खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा, गावच्या प्राथमिक शिक्षकांना शाळा गाठण्यासाठी करावी लागते आडीवरची कसरत.
खानापूर तालुका म्हणजे अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेल्या खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या प्राथमिक शाळाना जाणे म्हणजे एक आव्हान आहे.
अशा गवाळी प्राथमिक शाळेचे शिक्षक एस. आर. जाधव (मुळ गाव इचलकरंजी, महाराष्ट्र) हे सन २००४ पासुन आजतागायत खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील गवाळी शाळेत गेली २० वर्षे सेवा करतात.
जुन महिना आला. तर तालुक्यातील गवाळी, कोंगळा, पास्टोली गावांना जाण्यासाठी लागणाऱ्या नदी, नाल्यावरील आडीवरचा प्रवास म्हणजे धक्कादायक प्रवास असतो. अशा आडीवरून ते आजही प्रवास करत शाळेवर जाऊन सेवा बजावतात. खानापूर तालुक्यातील पास्टोली, गवाळी, कोंगळा गावच्या जंगलात आडीचा प्रवास, हिंस्त्र प्राण्याची भिती ही कायमच असते. या भितीची परवा न करता ते इतकी वर्षे दुचाकीवरून प्रवास करतात.
गवाळी गावची शाळा उच्च प्राथमिक मराठी शाळा असुन पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. अशा जंगल भागात जाधव नेटाने शाळा चालवितात. वर्षभर जंगलातून एकट्याला जाण्याचे धाडस कुणाला होत नाही. तरी जाधव सर वर्षभर कुणाची सोबत मिळते का? याची वाट कधीच बघत नाहीत. आपली शाळा हे एकच ध्येय त्यांनी उराशी बाळगुन गेली २० वर्षे शिक्षकी सेवा करणारा शिक्षक म्हणजे जाधव सर आपल्या कुटुंबापासुन दुर एकटेच गवाळी सारख्या गावात राहतात. अनेक वेळा बदलीसाठी प्रयत्न करूनही त्याची बदली काही झाली नाही. तरीही जिद्दीने गवाळी शाळेची धुरा सांभाळतात. त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी जंगलातील गवाळी सारख्या गावात अनेक विद्यार्थी घडविले आहेत. अशा शिक्षकाची सेवा सरकारने लक्षात घेऊन आता तरी त्याच्या बदलीसाठी मुबा देणे गरजेचे आहे. तरी ही जाधव सर नाराज न होता. तितक्याच जिद्दीने गवाळीसारख्या गावात शिक्षकी सेवा बजावतात याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.