खानापूर : जोयडा तालुक्यातील मराठा समाज व मराठी भाषिकांची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार
निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी रामनगर, शिंगरगाव, वैजगाव आदी भागात प्रचार फेरी काढून पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी घरोघरी जाऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दळवी यांनी समितीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दररोज मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला असून सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यावेळी समितीला चांगले यश मिळणार असून यावेळी कारवार लोकसभा मतदारसंघात समिती इतिहास रचेल असा विश्वास व्यक्त केला.
माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार यांनी खानापूर तालुक्याच प्रमाणे जोयडा तालुक्यात मराठी भाषकांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळे मराठी भाषिकानी आपली जबाबदारी
समजून समितीच्या पाठीशी उभे राहावे आणि आपल्या भागात मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच मंगळवारी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन केले.
यावेळी रणजित पाटील, रामचंद्र गावकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………………………………………………………………….
खानापूर परिसरातील गांधीनगर, शिवाजीनगर, दुर्गा नगर आदी भागांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढून घरोघरी पत्रकांचे वितरण केले. यावेळी या भागातूनही समितीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच बरोबर कापोली या ठिकाणीही प्रचार फेरी काढण्यात आली. या ठिकाणीही समितीला चांगला प्रतिसाद लाभला आहे.