पुराचा सामना करण्यासाठी खबरदारी घ्या : सीईओ राहुल शिंदे
खानापूर : यावर्षी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तालुक्यातील सर्व गावांमध्ये अतिवृष्टी व पुराचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या.
बुधवारी (मे-२२) त्यांनी तालुक्यातील लोंढा ग्रामपंचायतीतील अतिवृष्टी व पांढरी नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी लोंढा गावाला पूर आल्याने पांढरी नदीकाठच्या रहिवाशांना अगोदरच अन्य ठिकाणी हलवावे लागले होते. गावात सुरक्षित ठिकाणी केअर सेंटर सुरू करून जेवण व निवासासह अन्य व्यवस्था करण्यात यावी. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आशा वर्कर्स यांच्या मदतीने वैद्यकीय उपचाराची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
काही वर्षांपूर्वी (2019-20, 2020-21) लोंढा गावात पांढरी नदीला आलेल्या पुरामुळे ज्यांची घरे व जमीन गेली, त्यांना राजीव गांधी महामंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मदत देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील मलप्रभा नदीसह इतर नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुराचा सामना करण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करा. याकडे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देण्याचे सांगितले.
आवश्यक तयारी करा
गरजू गावांमध्ये काळजी केंद्रे सुरू करावीत. पुरामुळे ज्या गावांचा संपर्क तुटला आहे त्यांची ओळख पटवून लोकांना अगोदरच केअर सेंटरमध्ये हलवण्यात यावे. कुशल जलतरणपटूंची यादी, स्वयंसेवकांची यादी ठेवावी. अन्नधान्य साठवले पाहिजे. औषधोपचाराच्या व्यवस्थेसह इतर आवश्यक व्यवस्था कराव्यात, अशी सूचना सीईओंनी केली.
यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जहागिरदार, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत सहाय्यक संचालक विजया कोथिन, ग्रामविकास अधिकारी शिवानंद खोत, अध्यक्ष नीळकंठ उसपकर, तांत्रिक सहाय्यक बसवराज होसमनी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta