
बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे हे बेळगाव, गोवा आणि आसपासच्या शहरातील पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करत असतात. परंतु संबंधित क्षेत्र बिबट्या आणि वाघांसारख्या वन्य प्राण्यांचे माहेरघर असलेल्या संरक्षित जंगलात मोडते आणि जे मुसळधार पावसात धोकादायक ठरू शकते.
वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यामध्ये खानापूर जंगलातील दृश्यमानता कमी होऊन अपघाताची शक्यता वाढत असल्यामुळे परिसर सुरक्षेच्या दृष्टीने चेक पॉइंट्स आणि पाळत वाढवण्यात आली आहे. भीमगड वन्यजीव अभयारण्यासारख्या भागातील प्रवेशास आता सक्त मनाई आहे.
वन विभागाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta