

खानापूर : खानापूर तालुक्यातील गणेबैल काटगाळी रस्त्यावरील जंगल भागात गवी रेड्याने बैलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात सदर बैलाचा जबडा पूर्णपणे तुटला असून त्याला चारापाणी खाणेदेखील अशक्य झाले आहे. हा बैल गणेबैल येथील शेतकरी देवाप्पा राघोबा गुरव यांच्या मालकीच्या आहे.
वन खात्याला या घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी व पशु संगोपन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पशु संगोपन खात्याच्या वैद्य अधिकाऱ्यांनी सदर बैलावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली आहे त्यामुळे प्रशासनाने सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी नेगील योगी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर सुळेभावीकर यांनी केली आहे. गवी रेड्याच्या हल्ल्यात बैलाचा जबडा पूर्णपणे फाटला असला तरी बैलाला इतर कोठेही इजा झालेली नाही पशु संगोपन खात्याच्या वैद्य अधिकाऱ्यांनी जखमी बैलावर प्रथमोपचार करणे गरजेचे होते परंतु फाटलेल्या जबड्यावर उपचार होत नसल्यामुळे चारा विना बैलाच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. नेगील योगी रयत संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर सुळेभावीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व शासनाने सदर बैल मालकाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी नारायण कोलेकर, मारुती भूताप्पा गुरव, रमेश कवठणकर, ज्ञानेश्वर गजेपतकर, संदीप गुरव, मीनाजी गुरव, पुंडलिक गुरव, आदी शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta