

खानापूर : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तिवोली आणि गुंजीसह आसपासच्या भागात हत्तींचा उपद्रव तीव्र झाला आहे. दररोज विविध गावांत टोळके शिरून भातपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असून, सुगी हंगामातच हा अनाहूत संकट शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरत आहे. हत्तींच्या वाढत्या वावरामुळे भात कापणी आणि मळणीची कामे वेगाने उरकण्याची शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने
मजुरीचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत कापोली, शिंदोळी, जटगा, डिगेगाळी, गुंजी, कामतगा, भटवाडा, संगरगाळी, भालका, शिपेवाडी आणि तिवोली या भागांमध्ये हत्तींचा धुमाकूळ सतत सुरु आहे. गावकऱ्यांनी अनेकवेळा एकत्र येऊन आरडाओरडा करत हत्तींची हकालपट्टी केली तरी अंधाराचा फायदा घेऊन हत्ती पुन्हा शेतात शिरत असल्याची तक्रार केली आहे.
हत्तीचा युवकावर हल्ल्याचा प्रयत्न
तिवोली गावात कु. पवन दीपक हेब्बाळकर याच्यासोबत घडलेली घटना तर थरारक होती. गावाच्या वेशीजवळून जात असताना झुडुपातून अचानक एक प्रौढ हत्ती समोर आला. सोंड मारण्याचा प्रयत्न झाला असला तरी युवकाने प्रसंगावधान दाखवत हत्तीची नजर चुकवून पळ काढला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर तिवोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींचा उपद्रव वाढत असतानाही वनखात्याकडून योग्य ती कारवाई न झाल्याची ग्रामस्थांची नाराजी कायम आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वर्षभराच्या कष्टाने उभे केलेले भातपिक हत्तींच्या हल्ल्यामुळे डोळ्यांसमोर नष्ट होत असून, आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात वाढले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta