
खानापूर : मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शाळेच्या विकासासाठी पुढे येणे आवश्यक असून माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळांचा कायापालट झाल्यास गावातील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे.


हलगा (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना हलगा गावची सुपुत्र आणि नायजेरिया येथे वास्तव्यास असलेल्या प्रकाश कडगावकर यांच्यातर्फे जर्किन वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्राम पंचायत सदस्य नागेशी गावडू पाटील होते. यावेळी रणजीत पाटील यांनी हलगा शाळेतून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केली असून नायजेरिया सारख्या देशात नोकरीला असून देखील कडगावकर यांनी गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांचा विचार केला ही अतिशय चांगली गोष्ट असून गावातील सर्वच माजी विद्यार्थ्यांनी शाळा आणि विद्यार्थ्यांच्यासाठी चांगले उपक्रम राबवावेत त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ होईल तसेच अनेक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील असे मत व्यक्त केले.
प्रकाश कडगावकर यांनी परदेशात किंवा देशाच्या इतर भागात नोकरी करत असताना देखील गावाशी नाळ कायम ठेवणे गरजेचे असून येणाऱ्या काळात देखील शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती दिली.
प्रारंभी विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक सौं. जे.पी. कुंभार यांनी स्वागत करताना शाळेच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी पुंडलिक पाटील, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महाबळेश्वर फठाण, उपाध्यक्ष गीतगंगा फठाण, गंगाराम पाटील, नागेश फठाण, विनोद फठाण, रामचंद्र सुतार यांच्यासह इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta