
माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या भव्य पुतळ्याचे आणि आकर्षक संग्रहालयाचे उद्घाटन येत्या १९ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास मंत्रिमंडळातील सुमारे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित राहणार आहेत.
सिद्धरामय्या सरकारने या वीरभूमीच्या विकासासाठी आतापर्यंत शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च केला असून, नुकताच आणखी २८ कोटी रुपयांचा नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केला. काम दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी वेळोवेळी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या होत्या.
क्रांतिवीर संगोळी रायण्णा – स्वातंत्र्यलढ्यातील धगधगता योद्धा
क्रांतिवीर संगोळी रायण्णा हे कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभागात जन्मलेले आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध धैर्याने लढणारे महान स्वातंत्र्ययोद्धे होते. त्यांचा जन्म इ.स. १७९८ साली कर्नाटकातील संगोळी गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव रायण्णा सिद्धप्पा असे होते. बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा शूर आणि निर्भीड स्वभाव त्यांच्यात दिसून येत होता.
रायण्णा हे कित्तूरच्या शूर राणी चन्नम्मा यांचे विश्वासू सेनानी होते. ब्रिटिशांनी ‘डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स’ या अन्यायकारक धोरणाच्या आधारे कित्तूर संस्थान बळकावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राणी चन्नम्मा यांनी त्याला तीव्र विरोध केला. या संघर्षात रायण्णांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी सैन्य संघटित केले, गनिमी काव्याचा वापर करून ब्रिटिश सैन्यावर हल्ले चढवले आणि जनतेत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.
कित्तूरचा लढा पराभूत झाल्यानंतरही रायण्णा डगमगले नाहीत. जंगलात राहून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरूच ठेवला. ब्रिटिश खजिन्यातून मिळवलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटल्यामुळे ते “जनतेचा नायक” म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे ब्रिटिश सत्तेला ते मोठा धोका वाटू लागले.
अखेर ब्रिटिशांनी फसवणुकीने त्यांना पकडले. त्यांच्यावर खटला चालवून १८३१ साली नंदगड (खानापूर) येथे फाशीची शिक्षा देण्यात आली. मृत्यूपूर्वीही त्यांनी ब्रिटिश सत्तेपुढे माफी मागण्यास ठाम नकार दिला. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांवरची निष्ठा अढळ होती.
संगोळी रायण्णांचे बलिदान १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीचे असले तरी, त्यांचा लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा पाया ठरला. त्यांनी दाखवलेले धैर्य, त्याग आणि देशप्रेम आजही प्रेरणादायी आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यांच्या नावाने अनेक स्मारके, पुतळे आणि संस्था उभारण्यात आल्या आहेत.
१९ जानेवारी रोजी नंदगड येथे होणार भव्य उद्घाटन
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार काल रात्री खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस महादेव कोळी, सुरेशभाऊ जाधव, ईश्वर घाडी, बाबू हत्तरवाड, सूर्यकांत कुलकर्णी, अल्ताफ बसरीकट्टी, तोहीद चांदखन्नवर, शफी काझी, अर्जुन सनदी लकेबैल यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta