खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने सीमा भागात “मराठी सन्मान यात्रा”चा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे, या सन्मान यात्रेची सुरुवात येत्या 26 जानेवारी रोजी रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन होणार आहे, या सन्मान यात्रेसंदर्भात चर्चा करण्यासाठी व त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बैठक आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते.
प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले तर मराठी सन्मान यात्रेची रूपरेषा त्याबद्दल कार्यक्रमाची माहिती खानापूर युवा समितीचे अध्यक्ष व युवा समिती सिमाभाग कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुरुवातीला कथन केली. त्यानंतर समितीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाई, विलासराव बेळगावकर, गोपाळराव पाटील, ऍड. अरुण सरदेसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, मुकुंद पाटील, चंद्रकांत देसाई, जयवंत पाटील, आदींची समायोजित व पाठिंबा दर्शविणारी भाषणे झाली व ही मराठी सन्मान यात्रा कशी यशस्वी करता येईल याबद्दल चर्चा झाली.
त्यानंतर मराठी सन्मान यात्रेला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करताना या सन्मान यात्रेत जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य समितीच्या वतीने करण्यात येईल खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले. या बैठकीत माजी आमदार दिगंबरराव पाटील, प्रकाश चव्हाण, जयराम देसाई, पांडुरंग सावंत, दत्तू कुट्रे, अमृत शेलार, हेब्बाळकर गुरुजी, वसंत नवलकर, बी.बी. पाटील, रमेश धबाले, रविंद्र शिंदे, रामचंद्र गावकर, रुक्माना जुंझवाडकर, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta