खानापूर तालुका आम आदमीचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लैला शुगर्स कारखान्याने 2500 दर जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादकांना प्रतिटन 2500 रूपये दर योग्य नाही. सध्या महागाई वाढते आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जबाजारी व्हावे लागते आहे.
सरकारने सर्व बाबतीत दर वाढविला आहे. मात्र शेतकर्यांच्या ऊसाला दर वाढविला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या ऊसाला प्रतिटन 3800 रूपये दर दिलाच पाहिजे, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी जोपर्यंत 3800 रूपये प्रति टन दर जाहिर करत नाहीत तोपर्यंत तालुक्यातील ऊसाची कांडी शेतकर्यांनी तोडू देऊ नये असे आवाहन आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी केले.
यावेळी उपतहसीलदार के. आर. कोलकाता यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, शहर अध्यक्ष गोपाळ गुरव, दशरथ बनोशी, मल्लिकार्जुन होसरी, मंजुळा बागेवाडी, रवी अंगडी, इम्रान अत्तार आदी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.