कोल्हापूर : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी गेल्या मंगळवारी हैदोस घातला होता.
कर्नाटकमधूनही बससेवा सुरु
दरम्यान, आज सकाळी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस पुण्याला रवाना झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली आहे.