कोल्हापूर : दक्षिण भारत जैन सभेचे वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वतीने विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीसम्राट प.पू. १०८ आचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांची ७० वी पुण्यतिथी महोत्सव जमखंडी जि. बागलकोट येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे.
विसाव्या शतकातील प्रथमाचार्य, चारित्र्य चक्रवर्ती समाधिसम्राट प.पू. १०८ प्रथमाचार्य श्री शांतिसागर महाराज यांचे पावन पवित्र्य, स्मृती चिंतन, अभिवादन करण्याबरोबरच त्यांना अभिप्रेत अशा चरित्र, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम या सारख्या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रचार प्रसार व्हावा त्यांच्या अलौकिक चिरंजीव आचार विचाराचे,त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती समाजाच्या सर्व स्तरावर पोहचावी यासाठी या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन वीर सेवा दला कडून होत असते.
या पुण्यतिथी महोत्सवाचा मुख्य महोत्सव सोमवार २५ ऑगस्ट रोजी संपन्न होत असून या महोत्सव साठी प.पू.स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी,नांदणी, प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर, प.पू.स्वस्तिश्री अभिनव चारुकिर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, श्रवणबेळगोळ, प.पू.स्वस्तिश्री देवेंद्रकिर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, हुमचा, प.पू.स्वस्तिश्री भट्टाकलंक भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, सौंदा, प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, नरसिंहराजपूर व प.पू.स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, वरुर यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. या मंगलदिनी त्यांच्या सल्लेखना समयी सकाळी ६.५५ वाजता शांतिद्विप प्रज्वलन, विश्वशांति प्रार्थना, अंतिम आदेश उपदेशाचा स्वाध्याय होणार आहे. तसेच पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ वा. अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एष्कात्मता, शांतिसद्भभावना रॅलीचा शुभारंभ बागलकोटचे जिल्हाधिकारी श्री संगाप्पा यांच्या हस्ते संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक श्री सिध्दार्थ गोयल यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. या रॅलीमध्ये वीर सेवा दलाचे हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते, शाखा-शाखा मधून आलेले पथनाट्ये, सामाजिक, राष्ट्रीय विषय व आशय असणारे संदेश देणारे देखावे, वाद्यपथक यांचा समावेश असणार आहे.
पुण्यतिथी महामहोत्सवाचा मुख्य समारंभ दुपारी २.१५ वा. बी.एल.डी.ई. कॉलेज पोलो मैदान जमखंडी येथे संपन्न होणार असून या समारंभाचे अध्यक्ष द.भा. जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच स्वागताध्यक्ष वीर सेवा दलाचे चेअरमन विजय पाटील असणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक राज्याचे मंत्री मा.सतीश जारकीहोळी, मा.डी. सुधाकर, मा. शिवानंद पाटील, मा.आर.बी. तिमापूर, मा.खा. राजू शेट्टी, आम. राजेंद्र पाटील यड्रावकर, आम.राहुल आवाडे, द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअरमन संजय शेटे, व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील, मुख्य महामंत्री अनिल बागणे, खजिनदार बाळासाहेब पाटील, संघटक शशिकांत राजोबा तसेच अरविंद मजलेकर, अजितकुमार भंडे, विद्यासागर माणगावे यांच्या व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ संपन्न होणार आहे. पुण्यतिथी महामहोत्सवानिमित्त जमखंडी येथे दि. १८ ऑगस्ट रोजी शांतिकलश रथ प्रवर्तन शुभारंभ, दि.२३ ऑगस्ट रोजी महाविद्यालीन वक्तृत्व स्पर्धा, युवक युवती संमेलन आयोजन केले आहे. तसेच श्री शांतिसागर, कर्मवीर व वीराचार्य यांचे प्रदर्शन, दि. २४ ऑगस्ट रोजी पाठशाळा वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा त्याचप्रमाणे दि. २५ ऑगस्ट रोजी शांतिदीप प्रज्वलन विश्वशांती प्रार्थना, ध्वजारोहण तसेच शांतिकलश भव्य स्वागत संपन्न होणार आहेत.
हा पुण्यतिथी महामहोत्सव वीर सेवा दल मध्यवर्ती समिती , श्री १००८ भ.पार्श्वनाथ दि.जैन मंदिर, श्री धर्मनाथ श्वेतांबर मुर्तीपुजक जैन मंदिर व दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ जमखंडी यांच्या वतीने संपन्न होत असून या पुण्यतिथी महोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन वीर सेवा दलाचे सेक्रेटरी अजितकुमार भंडे व्हा. चेअरमन अभयकुमार भागाजे, जॉ.सेक्रेटरी प्रकाश दानोळे, मुख्य संघटक सचिन नवले, संयोजक आण्णाप्पा शिरहट्टी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta