जळगाव : परधाडे ता. पाचोरा रेल्वेस्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेऊन असल्याचे स्पष्ट केले आहे.
जळगाव स्थानकावरुन दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस पाचोऱ्याच्या दिशेने निघाली. माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली. त्यानंतर वेगात असलेल्या रेल्वेगाडीने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेरुळांवर ठिणग्या उडत गेल्या. परधाडे स्टेशनवर रेल्वेगाडी थांबली. तेव्हा एका बोगीतील प्रवाशांना या ठिणग्या दिसल्यावर बोगीत आग लागली असावी, या शक्यतेने ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. तशातच समोरुन वेगात कर्नाटक एक्स्प्रेस आली. त्यावेळी रुळावरच्या प्रवाशांची धावाधाव सुरु केली असतानाच काहीजण रेल्वेगाडीखाली चिरडले गेले.
१२ जणांचे मृतदेह हाती
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर ५ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेल्पलाईनवर सेवा उपलब्ध
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२५७-२२१७१९३ या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta