

कुर्नूल : आंध्र प्रदेशच्या कुरनूरमध्ये शुक्रवारी पहाटे भरधाव बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली.
मिळालेल्या महितीनुसार, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एका खासगी बसला भीषण आग लागली. बंगळुरू- हैदराबाद महामार्गावर ही घटना घडली. कावेरी ट्रॅव्हल्सची बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती. चिन्ना टेक्कुर गावाजवळ या बसने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि बसला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण बसला आगीने वेढा घातला.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कुर्नूलमध्ये बसला लागलेल्या आगीत किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. खिडकीच्या काचा फोडून १२ प्रवासी बाहेर पडले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तर उर्वरीत प्रवासी बसमध्येच अडकून राहिले त्यामुळे ते जीवंत जाळले. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसला लागलेली आग इतक्या वेगाने पसरली की स्वत:चा बचाव करण्याची अनेकांना संधी मिळाली नाही.
ही आग इतकी भीषण होती की यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी तात्काळ मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मदत आणि बचाव कार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले. तसेच जखमींना आणि पीडितांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta