नालंदा : नालंदामधील शितला देवीच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ महिलांचा मृत्यू झालाय. तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती पाहता मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने ही दुर्घटना घडली. प्रत्येक मंगळवारी शितला देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते, पण यावेळी याच गर्दीत मोठी दुर्घटना घडली.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, नालंदा येथील शितला देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने भाविकांची संख्या वाढली होती. त्याचवेळी अचानक मंदिरात चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीनंतर लोक सैरावैरा धावू लागले. यामध्ये गर्दीत चिरडून ८ महिलांचा मृत्यू झाला. तर अनेक महिला आणि लहान मुले जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नालंदा येथील माता शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीला अत्यंत दुःखद आणि वेदनादायी म्हटले आहे.
शितला देवी मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे समजताच एसडीपीओ यांच्यासह वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजतेय. मंदिरात अचानक चेंगराचेंगरी का झाली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मंदिरात सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस दल तैनात करण्यात आले नव्हते. पण घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेने सांगितले की, ‘पाटण्याहून शितला देवी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरात अति प्रमाणात गर्दी होती. पण प्रशासनाकडून पुरेशी व्यवस्था केलेली नव्हती. गर्दी अति प्रमाणात वाढली, पुढे जाण्यासाठी एकमेकांना ढकलू लागले. त्याचवेळी ही घटना घडली.
Belgaum Varta Belgaum Varta