नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया देताना या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतं असं म्हटलं आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यास आसल्यास चर्चा करु. आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत असणाऱ्या शरद पवार यांनी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना पवारांनी, मविआ सरकार बनण्यापूर्वी अशाप्रकारची बंडाळी झाली होती याची आठवण करुन देताना, ‘यामधून काही नाही काही रस्ता निघेल याची मला खात्री आहे,’ असं उत्तर दिलं.
पुढे पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय अशी मागणी असल्याचं सांगत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी, “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं ते बोललेत हे मला माहिती नाही. तुमच्याकडूनच मला हे समजतंय,” असं सांगितलं. पुढे बोलताना शरद पवारांनी, या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असं सांगितलं. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असं सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta