Thursday , September 19 2024
Breaking News

लोकसभेसाठी भाजपाकडून १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी दिली आहे.

विनोद तावडे यांनी भाजापाच्या उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरातमधील १५, राजस्थानमधील १५, केरळमधील १२, तेलंगणामधील ९, आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीमधील ५, जम्मू काश्मीरमधील २, उत्तराखंडमधील ३, अरुणाचल प्रदेशमधील २, गोव्यातील १, त्रिपुरामधील १, अंदमान निकोबारमधील १ आणि दिव-दमणमधील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही.

पहिल्या यादीत ३४ विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू अरुणाचल प्रदेश पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लोकसभा निवडणूक लढवतील. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्यांदा गांधीनगर लोकसभेची जागा लढवणार आहेत. दरम्यान, यादी जाहीर करण्यापूर्वी विनोद तावडे यांनी सांगितलं की, २९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या पहिल्या १९५ उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. देशातील १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांची यादी आज (२ मार्च) जाहीर करत आहोत.

मनसुख मांडविया पोरबंदरमधून, राजनाथ सिंह लखनौमधून, जितेंद्र सिंह उधमपूरमधून, किरेन रिजिजू अरुणाचल प्रदेश पूर्वमधून, सर्वानंद सोनोवाल आसामच्या डिब्रूगढमधून, संजीव बालियान मुज्जफरनगरमधून लोकसभा निवडणूक लढवतील. गुजरातच्या कच्छमधून विनोद चावडा, भरुचमधून मनसुख बसावा, नवसारीमधून सी. आर. पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजपाने छत्तीसकडच्या कोरबामधून सरोज पांडेय, दुर्गमधून विजय बघेल, रायपूरमधून बृजमोहन अग्रवाल लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर, जम्मूमधून जुगल किशोर शर्मा हे भाजपाचे उमेदवार आहेत. हजारीबागमधून मनीष जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

दिल्लीतल्या लोकसभेच्या आठपैकी पाच जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून, मनोज तिवारींना उत्तर-पूर्व दिल्ली, बांसुरी स्वराज यांना मध्य दिल्ली, कमलकित सहरावत यांना पश्चिम दिल्ली आणि रामवीर बिधुडी यांना दक्षिण दिल्लीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *