निपाणी (वार्ता) : यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने येथील जवाहर तलावातील पाणीसाठा वाढलेला नाही त्यामुळे यावर्षी निपाणीकरांना पाणीटंचाईची झळ जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील कन्या शाळेजवळील भाजी मार्केट परिसरात असलेल्या व्हॉल्वमधून निरंतरपणे पाण्याची गळती होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपव्यव होत आहे. त्याकडे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देऊन ही गळती थांबविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यासाठी अनेक ठिकाणी व्हॉल्वची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी काही व्हॉल्व ठिकाणी निरंतरपणे पाण्याची गळती होऊन नासाडी होत आहे. याबाबत संबंधित ठिकाणच्या नागरिकांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना अशाप्रकारे पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय निरंतर पाणी वाया जात असल्याने परिसरात दलदल निर्माण होत आहे.
चार दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा होत असून अनेक भागात नळाच्या तोट्या चालूच ठेवल्याने पाण्याची नासाडी होत आहे. याशिवाय काही नागरिक नळाच्या पाण्याद्वारे वाहने धुण्यासाठी शौचालय आणि गटारी मध्ये पाणी सोडत आहेत. अशा ठिकाणची पाहणी करून नगरपालिकेने संबंधिताना योगिता सूचना देण्याची मागणी होत आहे. याशिवाय काही ठिकाणी जलवाहिन्या कुठल्या असेल त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.