रयत संघटनेची मागणी; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या पावसासह पुरामुळे बेळगावसह निपाणी, चिकोडी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांची पडझड झाली आहे. पाऊस कमी झाला असून पूर ओसरत आहे. नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यानंतर नुकसानीचा नि:पक्षपातीपणे सर्वे करून संबंधितांना भरपाई द्यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन ही संघटनेतर्फे देण्यात आले.
राजू पोवार म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांच्या नुकसानीसह घरांच्या पडझडी झाल्या आहेत. सर्वे होऊनही आज तगायत नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत बऱ्याचदा तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत कळवूनही दुर्लक्ष झाले आहे.
यंदाही नदी काठासह परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही अनेक गावातील पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांची घरे पडली असून त्यांचा नि:पक्षपतिपणे सर्वे केला पाहिजे. पूर ओसरताच संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेच्या सूचना देण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, सुरेश परगन्नावर, किसन नंदी, राहुल कुबलटी, महेश सुभेदार, रमेश दाली, गंगाधर मुटी, पाडु बिरनगड्डी, वासु पंढरोळी, संगमेश सागर, अभिषेक गौड, रमेश कंबार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta