रवींद्र खैरे; निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन
निपाणी (वार्ता) : पत्रकार हे समाज आणि मन घडविणारे अभियंते आहेत. आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध लिखाण करून त्याला वाचा फोडून न्याय देण्याचे काम सुरू आहे. सध्याच्या ‘एआय’ युगातही पत्रकारितेची गरज आहे. पत्रकारच जगाला तारू शकतो. व्यवस्थेला प्रश्न विचारल्याशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे, असे मत कोल्हापुर येथील व्याख्याते रवींद्र खैरे यांनी व्यक्त केले.
निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे येथील व्हिएशन संस्थेच्या महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष अमोल नागराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हीएसएम संस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले, भोज पीकेपीएसचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन मुराबट्टे होते.
खैरे म्हणाले, ‘एआय’ मुळे समाज विधवांसतेच्या उंबरठ्यावर आहे. शिवा नव्या पद्धतीमुळे बुद्धीला पर्याय निर्माण झाला झाला असून आव्हानही दिले जात आहे. अशा काळात पत्रकारिता जिवंत ठेवणे आवश्यक आहे. पत्रकार झोपला तर समाजात अंदाधुंदी निर्माण होईल. पत्रकारिता हा विवेकाचा आवाज असून समाज सुधारण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी स्वतःमधील पत्रकारिता जागे करण्याची गरज निर्माण झाली आहे. राजकारणा पलीकडे अनेक बातम्या आणि प्रश्न असून त्यांच्या बदलासाठी पुन्हा क्रांती करावी लागेल, असेही खैरे यांनी सांगितले.
चंद्रकांत कोठीवाली यांनी, पत्रकारांच्या निर्भीड लिखाणामुळे समाजात जनजागृती होऊन समस्यांना वाचा फुटत असल्याचे सांगितले. अमोल नागराळे यांनी, पत्रकार संघाच्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेतला. संचालक पप्पू पाटील यांनी, सध्या पत्रकारांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे सीईओ सिद्धगौडा पाटील, डॉ. सुदर्शन मुराबट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राजेश शेडगे यांनी स्वागत विठ्ठल केसरकर यांनी प्रस्तावित केले. त्यानंतर संघातर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास व्हीएसएम संस्थेचे सेक्रेटरी समीर बालेवाडी, प्राचार्य डॉ. उमेश पाटील, संतोष पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, संस्थेचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. पांडुरंग मधाळे यांनी सूत्रसंचालन केले. मावळचे उपाध्यक्ष रंगराव बन्ने यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta