निपाणीत सर्वपक्षीय शोकसभा ; अनेकांना आले गहिवरून
निपाणी (वार्ता) : वक्तशीरपणा, स्पष्ट बोलणे, लोकहिताची कामे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची ख्याती होती. जात, पात, पक्ष आणि धर्मापलीकडे जाऊन काम करणारा हक्काचा माणूस अचानक पणे आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत बोलताना अनेकांनी व्यक्त केले.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक सीमा भागातही त्यांचे कार्य वखाण्याजोगे आहे. काळमावाडी पाणी वाटपाचा करार, सीमा भागातील शैक्षणिक संस्थांना केलेले सहकार्य सीमाभागातील नागरिक कधीही विसरू शकणार नाहीत. त्यांच्या निधनामुळे सीमा भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. स्पष्ट शब्दात रोख ठोक भूमिका मांडण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले होते. त्यांची विचारधारा जिवंत ठेवून सर्वांनी काम केल्यास खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असेही शोकसभेत मते व्यक्त करण्यात आली.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, युवा उद्योजक रोहन साळवे, पंकज पाटील, राजेंद्र वडर, सुप्रिया पाटील, प्रा बाळासाहेब सूर्यवंशी, अस्लम शिकलगार, शामराव पुंडे, प्रा. भारत पाटील, जयराम मिरजकर, महादेव कौलापुरे, बळीराम भराडे, गणी पटेल, किसन दावणे यांच्यासह मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. त्यानंतर त्यांना सर्व पक्षातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विजय शेटके, गजेंद्र पोळ, प्रशांत नाईक, दीपक वळीवडे, दीपक सावंत, विठ्ठल वाघमोडे, उदय शिंदे, गोपाळ नाईक, झाकीर कादरी, सुधाकर सोनाळकर, सुनिल हिरूगडे यांच्यासह निपाणी व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. किरण कोकरे यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta