
प्रवाशातून संताप; निपाणी आगार दुजाभाव करत असल्याचा आरोप
निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र आणि कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून निपाणी आगाराची ओळख आहे. पण त्या ठिकाणी कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था असल्याने प्रवाशांना बसची वाट पहात प्लॅटफॉर्मवर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना आसन व्यवस्थाच नसल्याने त्यांना उन्हाळा आणि पावसाळ्यात प्लॅटफॉर्मवर उभे राहावे लागत आहे. त्यामुळे निपाणी आगार महाराष्ट्रातील प्रवाशाबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला जात आहे.
दहा वर्षांपूर्वी प्रवाशांची लोकसंख्या लक्षात घेऊन येथे कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून हायटेक बस स्थानक निर्माण करण्यात आले. पण सर्वच प्रवासासाठी आसन व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे बहुतांश प्रवासी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहत आहेत. बस स्थानकातील चिक्कोडी येथील प्लॅटफॉर्मवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. त्याच्या शेजारीच महाराष्ट्रातील गडहिंग्लज, मुरगुड, मुधोळकतिट्टा, गारगोटी, सेनापती कापशी, हमिदवाडा परिसरात जाणाऱ्या महाराष्ट्रातील बस थांबतात. पण या प्रवासासाठी आसन व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. याबाबत महाराष्ट्रातील प्रवाशांनी बऱ्याचदा आगारप्रमुखांकडे आसन व्यवस्थेची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तात्काळ आसन व्यवस्था न केल्यास प्रवाशांतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
——————————————————————–
‘निपाणी हे शहर बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेजारीच असलेल्या महाराष्ट्रातील ग्राहक व प्रवाशांची मोठी गर्दी असते. पण त्यांच्यासाठी आसन व्यवस्थेची कमतरता असल्याने बसची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर थांबावे लागत आहे. तरी निपाणी आगाराने तात्काळ दखल घेऊन आसन व्यवस्था करावी’
-विनोद कुलकर्णी, प्रवासी, मुरगुड

Belgaum Varta Belgaum Varta