
निपाणी अनेक शेतकऱ्यांकडून गूळनिर्मिती; ऊसापासून तीन वर्षे उत्पादन
निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकरी वेदगंगा, दूधगंगा नदीचे पाणी, विहिरी, कुपनलिकेच्या पाण्यावर बारमाही पिकांचे योग्य नियोजन करीत शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा त्या भागातील काही शेतकरी त्यावर प्रक्रिया करून गुळनिर्मिती करीत आहेत. त्यामुळे ऊस शेतीतील गोडवा वाढला आहे.

तालुक्याच्या वेदगंगा आणि दूधगंगा काठचा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढल्याने नद्यांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बारमाही पिकांचे क्षेत्र वाढवले असून सुरक्षित पीक म्हणून उसाला प्राधान्य दिले आहे. एकवेळ लावण केल्यानंतर किमान तीन वर्षे खोडवा पीक घेण्याची सुविधा, हमखास उत्पादन, कमी प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव, वाड्याचा चारा म्हणून वापर, आंतरपीक घेता येते. शिवाय एकरी एक लाख रुपयापर्यंतचे उत्पादन मिळते. त्यामुळे सुरक्षित पीक म्हणून शेतकरी उसाला प्रथम प्राधान्य देत आहेत. अनेक शेतकरी कारखान्यांना ऊस देण्याऐवजी गु-हाळ करण्यावर भर देत आहेत. १,७०० रुपये गाळपाची मजुरी, शंभर रुपयांचे औषध, तीनशे रुपये क्रशर मजुरी, दोनशे रुपये डिझेल यासह तीन हजार रुपयापर्यंतचा खर्च प्रति आदनासाठी येत आहे.
——————————————————————-
गुऱ्हाळाचे अर्थशास्त्र
सद्यःस्थितीत प्रतिटन ३१०० ते ३२०० रुपये उसाला दर मिळत आहे. दोन टन उसावर प्रक्रिया केल्यास त्यापासून १२० किलो गूळ निर्मिती होते. प्रति आदन तीन हजार रुपये खर्च वजा ७ हजार रुपये दोन टन उसापासून मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
——————————————————————–
‘गुऱ्हाळाच्या माध्यमातून ३० टक्के अधिक नफा मिळतो. शेतकरी केवळ मेहनत टाळण्यासाठी कारखान्यांना ऊस देतात. योग्य नियोजन व पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास गुऱ्हाळाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारासह अधिकचा नफा मिळवता येतो.
-रघुनाथ यादव,
गुळ उत्पादक शेतकरी, कुर्ली
——————————————————————-
*निपाणी तालुक्यात ७ गुऱ्हाळघरे
*एका गुऱ्हाळासाठी ३२ मजुरांची गरज
*साधा गुळ ४० तर सेंद्रिय गुळ १५ रुपये किलो
*गुऱ्हाळघराचा हंगाम ३ तीन महिने
*सेंद्रिय गुळाला वाढती मागणी
*उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची सोय
Belgaum Varta Belgaum Varta