
सुनील शेट्ये ; ‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : सहकारी संस्थांमध्ये स्पर्धा वाढली असून विश्वस्त मंडळाची जबाबदारी मोठी आहे. समाजातील गरजवंतांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे काम पतसंस्थांच्या माध्यमातून होत आहे. सध्या कर्ज वसुलीचे आव्हान मोठे असतानाही महात्मा बसवेश्वर संस्थेच्या योगदानामुळे संस्था प्रगती पथाकडे झेप घेत आहे. आता बँकांमध्ये गुंतवणुकीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, असे मत कोल्हापूर येथील सुनील शेट्ये यांनी व्यक्त केले.
येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधी मठातील प्राणलिंग स्वामी उपस्थित होते.
प्रारंभी प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तर अध्यक्ष बाली यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
सुनील शेट्ये म्हणाले, उद्देश, धोरण आणि तारण विचारात घेऊनच कर्जाची सुविधा उपलब्ध केली पाहिजे. डिजिटल व्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याने ग्राहकापर्यंत पोहचणे सोयीचे झाले आहे. संस्थांचा कारभार पारदर्शी असल्यास बँकाबद्दलची आपुलकी वाढीस लागते. संस्थांच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळ आणि सभासदांचा महत्त्वाचा वाटा महत्त्वाचा असून महिला सभासदांची संख्या वाढविली पाहिजे. भविष्यात शेती उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केल्यास संस्था व सभासदांना लाभ मिळू शकतो. शिवा महिला व तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
प्राणालिंग स्वामी यांनी, सभासद व कर्जारांना पतपुरवठा करण्याबरोबरच संस्थेने समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सीईओ एस. के. आदन्नावर यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.
कार्यक्रमास संचालक डॉ. एस. आर. पाटील, प्रताप पट्टनशेट्टी, सुरेश शेट्टी, श्रीकांत परमने, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta