
व्याख्याते जगदीश ओहाळ; निपाणीत बौद्ध धम्म परिषद
निपाणी (वार्ता) : महात्मा गौतम बुद्धांनी देशाला शांतीचा संदेश दिला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिखाण करून त्यांचे विचार नव्याने जिवंत केल्याने संपूर्ण जग बुद्धमय होत आहे. त्याची जाणीव ठेवून प्रत्येकानी बौद्ध धम्म वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिज्ञा समजून घेतल्यास देशाची प्रगती शक्य आहे, असे मत व्याख्याते जगदीश ओहाळ यांनी व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी महोत्सव समितीतर्फे रविवारी (ता.१) येथील मराठा मंडळमध्ये म्युझिक बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तर कर्नाटकचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मनोहर मोरे होते.
धम्म परिषद कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर निपाणी प्रथम स्पर्श शताब्दी महोत्सव समितीच्या कार्याचा आढावा घेतला.
ओहाळ म्हणाले, समाजातील वर्णव्यवस्था काढण्यासाठी प्रत्येकाने गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांचे अनुयायी बनले पाहिजे. देशाला पुढे घेऊन जाताना डॉ. आंबेडकरांच त्याग आणि संघर्ष प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाने एकसंघ राहून लढा देण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. भालकी येथील म्हणते नवोपाल आणि बेळगाव येथील भन्ते ज्ञानज्योती यांनी यांनी, धम्माचे आचरण केल्यास शांतीचे विचार मिळतात. मूर्तीमध्ये बुद्धी नसून धम्म मार्मिक असताना त्याला धार्मिक बनवणे हे धम्म विचाराशी विसंगत असल्याचे सांगितले.
प्रा.डॉ. अच्युत माने यांनी, धम्म हा जगण्याचा विचार असून सध्या युद्धजन्य परिस्थिती वेळी देशाला शांतीची गरज आहे. धम्मामध्ये जगण्याची शाश्वत मूल्य असून त्याचा सर्वांनी अंगीकार करावा. बहुजनांनी ठरवले तर सत्तेत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.
प्रारंभी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी व मुंबईतील लेखक परशुराम कर्निंग यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन, ध्वजारोहणव प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर बुद्ध वंदना झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा परिषदेतर्फे सत्कार झाला. यावेळी प्रा. जेडी कांबळे, अशोककुमार असोदे, राजेंद्र वडर -पवार, मल्लेश चौगुले, यमनाप्पा गडीनायक, रावसाहेब देवरमणी, नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर, संदीप माने, सुभाष ढाले, प्रा. अजित कांबळे, कबीर वराळे, राहुल शितोळे, ए. वाय. कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. नवजीवन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta