निपाणी (वार्ता) : शहरातील अनेक रस्त्यावरील गटारे तुटलेली, झाकणांशिवाय उघडी पडलेली असल्याने पादचाऱ्यासह वाहनधारकांना धोका होण्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या परिसरात तर अशा प्रकारचे अनेक उघड्या गटारी असल्याने नागरिकांसह ग्राहक आणि व्यापाऱ्यांना येजा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शहरातील बहुतांश रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारीची मोडतोड झाली आहे. त्यामध्ये दगड, माती अडकून पाण्याचा निचरा न झाल्याने दुर्गंधी पसरत आहे. याशिवाय रात्रीच्यावेळी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अर्धवट उघडी आणि तुटलेल्या अवस्थेतील या गटारांमुळे अपघातांच्या घटना घडत असून अनेकजण जखमी झाले आहेत.विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना या समस्येचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही गटारीवर सुरक्षित झाकण बसविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नगरपालिका कराच्या रूपाने नागरिकांकडून रक्कम गोळा करते. मात्र मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. रस्त्यावरील फुटलेली गटारे नवीन, सुरक्षित गटारे बसविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र निकम यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta