‘हेस्कॉम’च्या कारभाराबाबत नाराजी : पाणीपुरवठा योजनावरही परिणाम
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमान ३१ अंशांवर गेले आहे. या उष्णतेमुळे नागरिकांकडून एसी, कूलर, फ्रीज, पंख्यांचा वापर वाढल्याने त्याचा परिणाम म्हणून शहरात दिवसभरविजेचा लपंडाव सुरू झालेला दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.
हेस्कॉमतर्फे काही दिवसांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, विजेचा भार वाढल्याने वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन पुरवठा खंडित होत आहे. शॉर्टसर्किटने आग लागून गाळे जळाल्याने शनिवारी चिकोडी रोड परिसरात दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीजपुरवठा बंद झाला होता. ग्रामीण भागात सध्या पिकांना पाणी घेण्याची कामे सुरू आहेत. पण वीज पुरवठा खंडित होत असल्याने पिके करपत आहेत.
बाजारपेठेतील व्यापारी संकुल परिसरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी वर्गालाही त्याचा फटका बसत आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन उन्हाळ्यात सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
—-

‘शेती पाण्यासाठी १२ तास निरंतर वीजपुरवठा करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याची अंमलबजावणी न करता ठराविक वेळेत मिळणारे वीजही खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिके वाळत आहेत.सुरळीत वीज पुरवठा न केल्यास कार्यालयावर मोर्चा काढला जाईल’
-राजू पोवार,
कार्याध्यक्ष कर्नाटक राज्य रयत संघटना
—
‘पावसाळ्यापूर्वीची किरकोळ कामे सुरू असल्याने वीज खंडित केली जात आहे. या काळात शेतकरी व व्यवसायिकांनी सहकार्य करावे’
-सुरेश तहसीलदार,
अभियंते हस्कॉम, निपाणी
—-
Belgaum Varta Belgaum Varta