१२ केंद्रावर ४ हजार २६४ परीक्षार्थी ; बुधवारपासून परीक्षेला प्रारंभ
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेली दहावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता.१८) सुरू होत त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा निपाणी तालुक्यातून एकूण ४ हजार २६४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनो ‘ऑल द बेस्ट’ भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
शहर आणि ग्रामीण भागात बारा केंद्रावर या परीक्षा होणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यापूर्वीच विविध प्रकारची जनजागृती आणि उपक्रम राबवण्यात आले आहेत. यंदाच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेच्या काळात प्रशासनाची विशेष नजर राहणार असून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पड़ावी, यासाठी विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचण्यासह परीक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांवर दबाव न टाकता त्यांना मानसिक आधार द्यावा. आत्मविश्वास आणि शांत मनाने परीक्षा द्या, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
——————————————————————–
‘परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून सर्व परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा सुरू असताना केंद्र परिसरात झेरॉक्सची दुकाने बंद राहतील याची दक्षता घेण्यात आली आहे.’
-महादेवी नाईक, गटशिक्षणाधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta