निपाणी ( वार्ता) : भाषावार प्रांतरचना झाल्यापासून आजपर्यंत सीमा भागात कन्नड मराठी भाषिक एकत्रितपणे राहत आहेत. तरीही कर्नाटक सरकार वेगवेगळ्या मार्गाने सीमा भागातील मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. याशिवाय कन्नड सक्तीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यस्थी करून सीमा भागातील मराठी बांधवांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची सोमवारी (ता.३०) भेट घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी सीमाभाग अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील (भिवशीकर) यांनी दिली. मुंबई येथील हुतात्मा चौकात रविवारी (ता.२९) कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते बोलत होते.
लक्ष्मीकांत पाटील म्हणाले, गेल्या ७० वर्षापासून मराठी भाषिक सनदशीरपणे न्यायालयीन लढा लढत आहेत. हा लढा अंतिम टप्प्यात असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकावर अन्याय करत आहेत. तरीही मराठी भाषिक संयम राखून न्यायालय निकालाची वाट पाहत आहेत. असे असताना मराठी भाषिकासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह शुभम शेळके यांच्यावर सुमारे २७ खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे हा अन्याय मराठी भाषिक कदापी सहन करणार नाहीत. बेळगाव महानगरपालिकेत ठराव करण्यासाठी मराठी भाषिक नगरसेवकावर दबाव आणणे चुकीचे आहे. या दबावाला ते कधीही बळी पडणार नाहीत.
खासदार धैर्यशील माने यांनी सीमा भागातील मराठी बांधवांच्या वर होणारे अन्याय बाबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची घोषणा केली आहे. त्याची आठवण करून देण्यासह महाराष्ट्रातील नेते मंडळींना सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय बाबतची माहिती सोमवारी दिली जाणार आहे. मराठी भाषिकांना न्याय मिळावा, यासाठी १०७ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. आता न्याय न्याय मिळाल्यास आम्हीही बलिदान देण्यासाठी तयार असल्याचे लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी संजय पाटील, विक्रांत गोरे, संदीप संग्रोळे, उत्तम पाटील, राजू देसाई, दिग्विजय पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व मराठी भाषिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta