
निपाणी (वार्ता) : गेल्या तीन-चार वर्षांप्रमाणेच याही वर्षी निपाणीकरांना पिवळ्या गढूळ पाण्याच्या ‘डोस’ची शिक्षा सुरू आहे. शहराला पुरवठा होणाऱ्या पिवळ्या पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटायला तयार नाही. जैन इरिगेशन कंपनीचे अधिकारी, नगरपालिका अधिकाऱ्यांचे नागरिकांच्या महत्त्वाच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अखेर माजी सभापती राजन चिकोडे यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी जैन इरिगेशन कंपनीला दिले आहेत.
जवाहर तलावात मुबलक पाणीसाठा असताना नियोजनाअभावी निपाणीकरांसाठी दुष्काळात तेरावा महिना सुरू असल्याचा प्रकार आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा हा परिणाम असून अलीकडेच पाहायला मिळत आहे. अनेक कुटुंबीयांनी पाणी नसतानाही बिले भरून पुन्हा भरमसाठ बिले येत आहेत. सध्या पिवळ्या गढुळ पाण्याचा पुरवठा सुरू आहे. चार ते पाच दिवसातून एकदाच शहराला पाणी मिळत आहे. तेही कमी दाबाने असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
उन्हाळ्यात पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असताना प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी याकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. केवळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडले जाते. पण त्यामध्ये तुरटी अथवा इतर कोणतेही केमिकल टाकले जात नसल्याने पाणी पिवळे होत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या गंभीर समस्येची दखल घेऊन स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी शहर वर्षातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta