राजू पोवार : हादनाळ येथे रयतच्या शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. शिवाय खते, बी बियाणे, औषधानीही महागाईचा कळस गाठला आहे. पण शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या लोकांना मात्र हमीभाव मिळत नसल्याने तो दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावरील होणाऱ्या अन्यायाला थोपविण्यासाठी रयत संघटनेच्या माध्यमातून निरंतरपणे कार्य सुरू आहे. त्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांनी संघटित राहून जागृतपणे कार्य करण्याची गरज आहे, असे मत चिकोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेच्या हादनाळ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी शाखेचे अध्यक्ष सदाशिव शेटके यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपिठावर मान्यवरांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाले.
राजू पोवार म्हणाले, काही नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करत आहे पण त्यांच्या पिकाला हमीभाव देण्यासाठी कधीही प्रयत्न केलेला नाही. रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जात आहे. पिकांच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. रयत संघटना ही राजकारणविरहित असून केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हाच उद्देश त्या संघटनेचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची आहे.
यावेळी निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर, सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, नामदेव साळुंखे, अनिकेत जोमा, बबन जामदार, भगवंत गायकवाड, अनंत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश किल्लेदार, संदीप पाटील अशोक पाटील, अक्षय पाटील, सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, गणपती पाटील, अभिजित पाटील, नंदकुमार शेटके, दिलीप यादव, सतीश शेटके, तानाजी शेटके, गजानन शेटके, अविनाश पाटील, बाबुराव पाटील, शहाजी पाटील, पांडुरंग पाटील नामदेव पाटील यांच्यासह रयत संघटना व हरित सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तानाजी पाटील यांनी आभार मानले.