
अधिकाऱ्यांना धरले धारेवर : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी
कोगनोळी : हणबरवाडी दत्तवाडी कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या वेळी या ठिकाणी असणाऱ्या उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
गेल्या महिनाभरापासून परिसरातील विद्युत पुरवठा अखंडित पणे सुरु आहे. त्यामुळे शेतीला पाणी देणे अवघड जात आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते.
वीज केंद्राकडून शेतीसाठी दिवसात तीन तास व रात्री चार तास अशी एकूण सात तास वीजपुरवठा केला जात आहे. पण गेल्या महिन्याभरापासून वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकर्यांना शेतीला पाणी देणे अवघड जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीला पाणी देणे फार गरजेचे आहे. यातच हेस्कॉमकडून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने आता तोंडाला आलेली पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोगनोळी हणबरवाडी व दत्तवाडी येथील शेतकऱ्यांनी येथील हेस्कॉमवर धडक मोर्चा काढून या ठिकाणी असणाऱ्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
दिवसा तीन तास व रात्री चार तास अशी वीजपुरवठा करण्यात यावी. त्याचबरोबर खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करून देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
या वेळी या ठिकाणी उपस्थित असणारे हेस्कॉम अधिकारी अक्षय चौगुले यांनी दिवसा तीन तास व रात्री चार तास वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल त्याचबरोबर या काळात वीजपुरवठा बंद झाल्यास जेवढा बंद होईल तेवढा वाढवून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी प्रदीप पाटील, नामदेव खोत, धनाजी कागले, राजेंद्र चौगुले, राजगोंडा चौगुले, संजय मगदूम, तात्यासाहेब कागले, कीर्ती पाटील, अनिल खोत, बाबासाहेब पाटील, धीरज मगदूम, राजेंद्र चव्हाण, कुमार खोत, शरद चौगुले, पोपट पसारे, तौसीफ करनुरे, बाहुबली पाटील, अजित पाटील यांच्यासह कोगनोळी हणबरवाडी दत्तवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta