पंडित अतुलशास्त्री भगरे : श्रावणानिमित्त निपाणीत प्रवचन
निपाणी (वार्ता) : बालक भविष्यात, वृद्ध भूतकाळात तर युवक वर्तमानात जगत असतो. हिंदू संस्कृती व धर्माची ओळख आजच्या युवा पिढीला करून देऊन त्यांना संस्कारक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. कारण हाच युवक देशाचा शिल्पकार आहे, असे मत पंडित अतुलशास्त्री भगरे -गुरुजी यांनी व्यक्त केले. अर्जुन नगर येथील येथील श्रीमंत राजमाता जिजाऊ फौंडेशन आयुर्वेदाचार्य वैद्य मच्छिंद्रनाथ व ज्योतिषाचार्य गोरखनाथ चिकोडे यांच्या 125 व्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या आयुर्वेदिक आरोग्य शिबिर व श्रावणमास प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी कोल्हापूर भाजप जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. प्रारंभी पंडित भगरे -गुरुजी यांचा धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव आरमणी दाम्पत्यांच्या हस्ते सत्कार झाला.
भगरे गुरुजी म्हणाले, आज आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आहोत. मुलगा किंवा मुलगी जन्माला आले की ते कुलदीप. मात्र त्यांच्या वाढदिवसा साजरा करताना दिवा विझवून वाढदिवस साजरा केला जातो. दिवा विझवणे हे अशुभ तर अन्नाचे विच्छेदन शस्त्राने करणे निषिद्ध मानले जाते.तरी ही केक सुरीने कापून दिवा विझवणे ही प्रथा शुभ की अशुभ तुम्हीच ठरवा. अध्यात्मिक व धार्मिक महत्त्व असलेल्या या श्रावण मासात धार्मिक ग्रंथाचे वाचन केल्याने पुण्य प्राप्त होते. प्रवचन म्हणजे ज्ञानगंगा असून त्याचा लाभ जीवनात घेणे आवश्यक आहे. योगेश्वर चिकोडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फौंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.