Sunday , September 8 2024
Breaking News

कृषी मंत्र्यांच्या दौरा केवळ राजकीयच!

Spread the love

चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक
निपाणी : अतिवृष्टी महापूर आणि कोरोना काळात शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी निपाणी तालुक्याचा दौरा करून एक दिवस शेतकर्‍यासाठी हा उपक्रम राबविला. पण या दौर्‍यामध्ये त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्‍या पर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे हा दौरा केवळ राजकीय असून शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्याऐवजी त्यांनी शेतकर्‍यांना भरपाई दिली असती तर शेतकर्‍यां मधून समाधान झाले असते, असे मत रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. बुधवारी(ता. 29) दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, अतिवृष्टी व महापुरामुळे पिकासह अनेकांच्या घरांची दुरवस्था झाली आहे. कृषी मंत्र्यांच्या दौर्‍यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांची विचारपूस करतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी अशा शेतकर्‍यांची भेट न घेता केवळ काही ठिकाणी दिखाऊपणा करून दौरा आटोपता घेतला आहे. कोगनोळी येथील जमीन संपादनासंदर्भात रयत संघटनेतर्फे आपण जिल्हाधिकारी मुख्यमंत्री आणि तालुका प्रशासनाची वारंवार संपर्क साधून निवेदने व माहिती दिली आहे. हा प्रश्न महत्त्वाचा असताना कोगनोळी येथील शेतकर्‍यांबाबत कोणतीच विचारपूस केली नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सलग दोन वर्षे शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र आजतागायत कोणतीच भरपाईबाबत कृषिमंत्र्यांनी बोलणे टाळले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपयांची मागणी करण्यासह विज बिल आणि घरफळा माफ करण्याबाबत आपण निवेदने दिली आहेत. मात्र याउलट बँकांची कर्ज वसुलीही जोरात सुरू आहे. त्याबाबत त्यांनी अशा महत्त्वाच्या बाबीबाबत मौन पाळले आहे. साखर कारखाने तोट्यात असल्याचे सांगून काही साखर कारखान्यांचे ऊसाचे अंतिम बिलही मिळत नाही. मग निवडणुका कशाला घेता असा प्रश्नही राजू पोवार यांनी व्यक्त केला.
साखर कारखान्यांचे शेअरची किंमत वाढली असून उलट साखर ही निम्म्याने कमी करण्यात आली आहे हा अन्याय आहे का? त्यामुळे कारखान्यावर होणारा खर्च कमी करून शेतकर्‍यांना चांगला ऊस दर देण्यासह हक्काची साखर देणे ही क्रमप्राप्त आहे. एकंदरीत कृषी मंत्र्यांचा दौरा हा राजकीय असून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचेही राजू पोवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी रयत संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष प्रा. आय. एन. बेग, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, कार्याध्यक्ष प्रवीण सुतळे, ग्रामीण अध्यक्ष सदानंद नागराळे, कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे, युवा अध्यक्ष बाळासाहेब हादीकर यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *