पत्रिकेवरील विषयांना मंजुरी: चर्चेसाठी वेळ न दिल्याचा विरोधकांचा आरोप
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची सभा सात महिन्यानंतर शुक्रवारी (ता.१२) सकाळी पार पडली. यावेळी मागील सभेच्या प्रोसिडिंगला मंजुरी देण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर म्हणत केवळ अर्धा तासात सभा गुंडाळली. तर विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा करण्यास संधी न दिल्याचा आरोप विरोधी गटाने केला. त्यानंतर दोन्ही गटातर्फे बैठक घेऊन परस्पर विरोधी भूमिका मांडल्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत वाटले तर व्यासपीठावर मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोले, सभापती राजू गुंदेशा यांची उपस्थिती होती.
प्रारंभी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांनी स्वागत केले. त्यानंतर शरद सावंत यांनी विषय पत्रिकेवरील वाचन केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते व मान्यवरांच्या विविध पदावर निवडीमुळे त्यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला.
मागील सभेचा वृत्तांत वाचताना खासगी लेआउटमधील प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विरोधी गट नेते विलास गाडीवडर यांच्या प्रश्नावरून माहिती समजून घेतली. शिवाय त्यांनी तीन वर्षा मागील प्लॉट विकसित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. पुढील काळात असे प्लॉट विकसित न करणाऱ्या वर कारवाई करता येईल असे सांगितले. त्यानंतर सभापती राजू गुंदेशा व विलास गाडीवड्डर यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक उडाल्याने सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी आपलेच मुद्दे योग्य असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय २४ तास पाणी योजने संदर्भातही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयुक्त जगदीश हुलगेजी व नगराध्यक्ष भाटले यांनी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून जैन इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शहरवासीयांना २४ तास पाणी देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे सांगितले. अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना अस्लम मुल्ला यांनी समाज माध्यमावर तिरंग्याचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले असून त्यांचा निषेध करण्याचा ठराव करण्याची मागणी नगरसेवक दत्ता जोत्रे यांनी केली.
शहरात २४ तास पाणी योजना १०० टक्के कार्यान्वित नसताना मीटरनुसार बिल का? असा प्रश्नही केला.
विधवा मातांचा सन्मान व्हावा, यासाठी ठराव करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून शहरात वाचनालय आणि गव्हाण येथे ज्ञानमंदिर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या विषयाला मंजुरी दिली. काही विषय किरकोळ विषय वगळता विरोधकांनी अनेक विषयांना विरोध नोंदविला. एकंदरीत सात महिन्यानंतर झालेली सभा गोंधळामुळे घाई गडबडीत आटोपती घेण्यात आली.
सभेस उपनगराध्यक्ष नीता बागडे, नगरसेवक सद्दाम नगारजी, संतोष सांगावकर, संतोष माने, दीपक पाटील, उदय नाईक,सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी, रंजना इंगवले, उपासना गारवे, दिपाली गिरी, सोनल कोठडीया, अरुणा मुदकुडे, सोनाली उपाध्ये, विरोधी गटाचे नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, डॉ. जसराज गिरे, शेरू बडेघर, दत्ता नाईक, शौकत मनेर, संजय पावले, अनिता पठाडे, शांती सावंत, दिलीप पठाडे, अनिस मुल्ला यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.