संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि संसुध्दी गल्लीत रस्त्या शेजारी बसून भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापारींना आणि केळी, सफरचंदचे गाडे, भेळ गाडा हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम करुन दाखविले आहे. त्यामुळे आज बाजारात वाहतुकीची कोंडी थांबलेली दिसली. कालच्या पालिका सभेत कमतनूर वेस येथील वाहतुकीच्या कोडींविषयी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्याने आज मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांनी पालिका कर्मचारींना कार्यवाही करण्याचा आदेश धाडला होता. त्यानुसार पालिका कर्मचाऱ्यांनी बाजारात वाहतुकीच्या कोडींस कारणीभूत ठरणारे केळी सफरचंद फळांचे गाडे, किरकोळ भाजीपाला विक्रेते यांना बाजूला हटविण्याचे कार्य केले. वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरलेला भेळ पाणीपुरीचा गाडा देखील हटविण्याचे कार्य करण्यात आले आहे. पालिकेचे सुपरवायझर श्रीकांत बेळवी, मुकादम सुनिल पाटील, कृष्णा खातेदार, परशुराम सत्यनाईक आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यवाहीचे काम हाती घेतलेले पहावयास मिळाले. आज मार्ग मोकळा झाल्याने कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि संसुध्दी गल्लीत दुचाकी चारचाकी वाहने ॲटोरिक्षांची ये-जा सुरळितपणे चाललेले चित्र पहावयास मिळाले. पालिका कर्मचाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कार्यवाही केल्यामुळे लोकांतून विशेष करुन वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.