हैदराबाद : आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज आहे आणि हेच हैदराबादच्या मैदानात रोहित शर्माच्या शिलेदारांनी दाखवून दिलं. भारतानं हैदराबादचा तिसरा टी20 सामना 6 विकेट्सनी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 टी20 सामन्यांची मालिका खिशात घातली. पण या विजयात चमकला नव्हे तर तळपला मुंबईचा सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारनं विराट कोहलीच्या साथीनं 187 रन्सचं लक्ष्य टीम इंडियासाठी सोपं करुन सोडलं. त्यामुळे या निर्णायक सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली आणि मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते केलं.
सूर्यकुमारची वादळी खेळी
ऑस्ट्रेलियानं हैदराबादमध्ये टीम इंडियासमोर 187 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण लोकेश राहुल (1) आणि कर्णधार रोहित शर्मा (17) ही सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर भारताची 2 बाद 30 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्या आणि विराटनं खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. त्यानंतर या दोघांच्या फटकेबाजीनं प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. पण त्यात सूर्यकुमार विराटपेक्षा आक्रमक दिसला. त्यानं ऑस्ट्रेलियाची बॉलिंग अक्षरश: फोडून काढली. तिसऱ्या विकेटच्या रुपात बाद होण्यापूर्वी सूर्यानं अवघ्या 36 बॉल्समध्ये 5 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 69 रन्स फटकावले. सूर्या आणि विराटनं मिळून तिसऱ्या विकेटसाठी 104 धावा जोडल्या. हाच सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला.
विराटची दमदार खेळी
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं डाव पुढे नेला. त्यानंही 48 बॉल्समध्ये 3 फोर आणि 4 सिक्ससह 63 रन्सचं योगदान दिलं. तो बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्यानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
दरम्यान , नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची चांगली सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर कॅमेरून ग्रीन आणि आरोन फिंचनं पहिल्या तीन षटकात 10 च्या सरासरीन धावसंख्या 30 च्या पुढं नेली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 44 वर असताना आरोन फिंच बाद झाला. मात्र, त्यानंतरही कॅमेरून ग्रीननं आक्रमक खेळी सुरुच ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारनं कॅमरूनला बाद करून भारताला दुसरी विकेट्स मिळवून दिली. स्टीव्ह स्मिथ (10 चेंडू 9 धावा), ग्लेन मॅक्सवेल (11 चेंडू 6 धावा), जोश इंग्लिस (22 चेंडू 24 धावा), मॅथ्यूवेड (0) स्वस्तात माघारी परतले. मात्र, अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्सनं जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला 187 धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स प्राप्त झाली.