रायपूर : येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात भारतानं न्यूझीलंडवर 8 गडी राखून दमदार असा विजय मिळवला आहे. सामन्यात आधी अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला भारतानं बाद केलं. त्यानंतर 109 धावांचं माफक लक्ष्य केवळ 20.1 ओव्हरमध्ये दोन गडी गमावून पूर्ण केलं आणि 8 विकेट्सनी सामना जिंकला. सामन्यात गोलंदाजीत सर्वांनी उत्तम कामगिरी केली. शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्मानं अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्यात सर्वात आधी भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील काही सामन्यात प्रथम फलंदाजी करुन भारतानं मोठी धावसंख्या उभारत मोठे विजयही मिळवले होते. पण तरी आजच्या मैदानाची खेळपट्टी बघून बहुधा भारतानं प्रथण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा. पण कॅप्टनचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी योग्य असल्याचं दाखवून दिलं. पहिल्या ओव्हरपासून न्यूझीलंडचे गडी तंबूत परतत होते. शमीनं पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. शमीने भारताकजून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विशेष म्हणजे भारताकडून आज गोलंदाजी केलेल्या सहाही गोलंदाजांच्या खात्यात किमान एकतरी विकेट आली. न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरला. ज्यामुळे त्यांची धावसंख्या 108 पर्यंत पोहोचली आणि भारताला 109 धावांचं लक्ष्य मिळालं.
रोहित शर्माचं 48 वं आंतरराष्ट्रीय अर्धशतक
109 धावांचं सोपं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवातच दमदार झाली. कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर शुभमन गिलसोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर शर्मानं वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केलं. त्याच्या कारकिर्दीतील हे 48 वं आंतरराष्ट्रीय अर्धशतक होतं. ज्यानंतर मात्र लगेचच 51 धावांवर रोहित बाद झाला. कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण शुभमन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने नाबाद 40 तर ईशान किशनने नाबाद 8 धावा करत भारताचा विजय पक्का केला.
Belgaum Varta Belgaum Varta