विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने आधी दमदार फलंदाजीचं आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवत सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताकडे अजूनही मालिका जिंकण्याचे चान्सेस आहेत. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात आजचा सामन पार पडला. भारताने 180 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले; जे पार करताना 19.1 षटकात अवघ्या 131 धावांवर आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने 48 धावांनी जिंकला आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. आजच्या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्याने दक्षिण आफ्रिकेने हा निर्णय़ घेतला आहे. सामना पार पडणाऱ्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत चांगली आहे. या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आफ्रिकेने हा निर्णय घेतला. दरम्यान आधीच दोन सामने गमावलेल्या भारताला आज चांगली धावसंख्या गाठता येईल असे वाटत नव्हते. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांच्या फलंदाजीने हे चित्रच पलटले. ऋतुराजने 35 चेंडूत 57 तर ईशानने 35 चेंडूत 54 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. याशिवाय हार्दिकनेही महत्त्वपूर्ण अशा 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावत दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले.
चहल-पटेलची भेदक गोलंदाजी
180 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच खराब झाली. अक्षर पटेल, हर्षल पटेलसह चहलने सुरुवातीपासून उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या वाढवू दिली नाहीच उलट एका मागोमाग एक गडी देखील बाद केले. द. आफ्रिकेकडून हेनरीज क्लासेन याने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर भारताकडून आयपीएल गाजवणाऱ्या चहल आणि हर्षल पटेलने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतले. यावेळी हर्षलने 4 तर चहलने 3 गडी बाद केले. याशिवाय अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही एक-एक विकेट घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta