बेंगळुर : कायदा व सुव्यवस्था ढासळल्यानेच शिमोग्यात हर्ष या कार्यकर्त्याची हत्या झाली, या डी. के. शिवकुमार यांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र चांगलेच भडकले. त्यांच्या सत्ता काळात अशी कोणती घटना घडली नव्हती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे असे आव्हानच त्यांनी शिवकुमारांना दिले.
बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, शिवकुमारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या या आरोपावर मी चर्चा करणार नाही. मात्र त्यांचे सरकार असताना कायदा व सुव्यवस्था सुरळीत होती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे. त्यांच्या किती गृहमंत्र्यांनी राजीनामे दिलेत हे मी सांगेन. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या टीकेपेक्षा या राज्यात शांतता नांदणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी आमचे काम आम्ही करू, राज्यात शांतता, सुव्यवस्था राखू असे गृहमंत्री म्हणाले. हत्येची घटना राजकीय हेतूने प्रेरित आहे का अशी चर्चा राज्यात आहे. याबाबतच्या प्रश्नावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, तशी शंका आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. यामागे काँग्रेसच्या कोणाचा हात आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. शिमोगा पोलीस अलर्ट झाले आहेत. शिमोगा ड्रग्जची हब झाली आहे. हा प्रदेश अतिशय संवेदनशील झाला आहे. अलीकडेच पोलिसांनी अनेक क्विंटल गांजा जप्त केला आहे. अनेकदा चांगले अलर्ट राहूनही अशा घटना घडतात. मात्र आम्ही याचा सखोल तपास करून दोषींना शिक्षा करू. भविष्यात कोणी असे कृत्य करू नये असा धडा शिकवू असे गृहमंत्री म्हणाले.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/02/02-423x330.jpg)