दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन : नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती ही जुनी संस्कृती असून यामध्ये अनेक चांगल्या-वाईट प्रथांचा समावेश आहे. काही प्रथा परंपरा या कालपरत्वे बदलल्या आहेत. मात्र काही पपरंपरा अशा आहेत, ज्या त्यामागील भीतीपोटी अजूनही समाजात तग धरून आहेत. अशा परिस्थितीत निपाणी शहरातील विविध मार्गावर शहर कोल्हापूर वेस वरील दौलतराव पाटील मळ्याजवळील उड्डाण पुलाजवळ अमावस्या, पौर्णिमा व इतर दिवशी मोठ्या प्रमाणात उतारे टाकले जात आहेत. त्यामुळे लहान मुलासह महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन परिसरात उतारे पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शिवाय अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी निपाणी जायंट्स क्लब आणि दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
सुरेश घाटगे म्हणाले, सध्या 21 वे शतक असले तरी औषधोउपचार सोबत तंत्र, मंत्र उतारा यांचाही आधार घेऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला जात आहे. परिणामी दुसर्यांना त्यांचा त्रास होऊ नये, याचीही खबरदारी संबंधित व्यक्तीने घेतली पाहिजे.
दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशनचे संस्थापक निकु पाटील म्हणाले, निपाणी- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दौलतराव पाटील उड्डाणपुलाच्या ठिकाणी अनेक पद्धतीचे उतारे टाकले जात आहेत. या रस्त्यावर शाळकरी मुलापासून चाकरमान्यांची, प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. यामध्ये अशा उतारे टाकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक सुया, टाचण्या, टोचलेले लिंबू, नारळ, बाहुल्या, भोपळे, अन्नपदार्थ अशा अनेक वस्तू उतारा म्हणून या ठिकाणी टाकण्यात येत आहेत. कोणी दृष्ट काढण्यासाठी, कोणी भूतबाधा, दूर करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकण्यासाठी असे अनेक अघोरी प्रकार करत आहेत. असे उतारे टाकून जनमाणसात भीतीचे वातावरण पसरवू नये असे आवाहन केले.
उड्डाणपुलाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असून याबाबतीत उतारा टाकताना कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. शिवाय नगरपालिकेने या बाबीकडे लक्ष पुरवणे अपेक्षित असून या ठिकाणी रस्त्यावर पथदीपची व्यवस्था करण्यात यावी. नगरपालिकेने दोन दिवसात या परिसरात स्वच्छता मोहीम न राबविल्यास जायंट्स ग्रुप व दौलतराव फाऊंडेशनच्या वतीने येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुरेश घाटगे, रमेश भोईटे, निकु पाटील, वसंत धारव, महादेव बन्ने, आकाश मल्लाडे, रणजीत मगदूम, विक्रांत पावले, बबन निर्मले, छोटू पावले, महेश बाचणे, सागर पाटील यांच्यासह जायंट्स ग्रुप व फाऊंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2022/02/nippani-1-660x330.jpg)