Tuesday , March 3 2026
Breaking News

राज्य मंत्रिमंडळ फेरबदल : दिल्लीतील बैठकींना वेग, निर्णय हायकमांडच्या कोर्टात

Spread the love

 

बंगळूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक मंत्रिमंडळ फेरबदलाला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या पुन्हा दिल्लीला रवाना होणार असून, फेरबदलाच्या अंतिम स्वरूपाबाबत वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. या संपूर्ण घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला होता. राहुल गांधी यांनी एआयसीसी अध्यक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. या मंजुरीनंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला असून, प्रदेश काँग्रेसमधील सर्व घडामोडींवर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाचा ‘चेंडू’ आता एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कोर्टात असून, किती मंत्री वगळायचे, किती नवीन चेहरे सामील करायचे याबाबतची अंतिम बैठक खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील दिल्लीमध्येच थांबले असून, ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या चर्चेनुसार संपूर्ण फेरबदलाऐवजी फक्त रिक्त जागा भरून मर्यादित ‘विस्तार’ ठेवण्याचा पर्याय पुढे येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. फेरबदलावर शिवकुमार यांच्या भूमिकेचा परिणाम होणार हे स्पष्ट झाले आहे.
सत्ता वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षांना अनुसरून आपली भूमिका मांडतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर एआयसीसी अध्यक्ष खर्गे राहुल गांधींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी डी. के. शिवकुमार यांचे बंधू आणि माजी खासदार डी. के. सुरेश देखील दिल्लीला दाखल झाल्याने त्यांच्या हालचाली अधिक गूढ ठरल्या आहेत.
शिवकुमार यांचा कल सध्या फेरबदल न करता केवळ रिक्त पदे भरण्याकडे आहे. कारण व्यापक फेरबदल झाल्यास नेतृत्व बदलाचा गैरसमज निर्माण होऊ शकतो, असे त्यांचे मत मानले जाते. त्यामुळे काँग्रेसमध्ये फेरबदलाला व्यापक मंजुरी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे की, बेळगावमध्ये डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मोठा फेरबदल करण्याचा धोका घेणे योग्य नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदल किंवा विस्तार अधिवेशनानंतरच होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या मात्र तातडीचा कोणताही फेरबदल अपेक्षित नाही, अशीच भूमिका काँग्रेस नेतृत्वाने घेतल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *