मुलानेच आई-वडील आणि बहिणीची केली हत्या
बंगळूर : विजयनगर जिल्ह्यातील कोट्टुरू येथे एक धक्कादायक तिहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. अक्षय कुमार (आरोपी) याने आपल्या वडील भीमराज, आई जयलक्ष्मी आणि बहीण अमृता यांची २७ जानेवारी रोजी हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने तिघांचे मृतदेह घरातच पुरून टाकले आणि बंगळुरकडे पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
यानंतर अक्षय कुमारने बंगळुरमधील टिळक नगर पोलीस ठाण्यात कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार दाखल करताना त्याचे संशयास्पद वर्तन लक्षात आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान अक्षयनेच तिहेरी हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आरोपीला बंगळुरहून कोट्टुरू येथे आणून त्याच्या घरात सखोल तपास सुरू केला आहे.
आरोपी अक्षय कुमार हा मूळचा चित्रदुर्ग जिल्ह्यातील नायकनहट्टी गावचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. त्याचे वडील नोकरीनिमित्त कुटुंबासह कोट्टुरू येथे आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब कोट्टुरू येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.
Belgaum Varta Belgaum Varta