बंगळूर : राज्याचे हित आणि जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने काम केल्यामुळेच मला विक्रमी १७ अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. विरोधकांवर टीका करत त्यांनी आपल्या कामगिरीचे जोरदार समर्थन केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाजपचे १४, काँग्रेसचे १० आणि धजदचे २ अशा एकूण २६ सदस्यांनी सुमारे १४ तास ४० मिनिटे चर्चा केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “पक्षाच्या हायकमांडचा पाठिंबा, आमदार आणि जनतेचे आशीर्वाद नसते तर इतक्या वेळा अर्थसंकल्प मांडणे शक्य झाले नसते.”
विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी “पुढील दोन अर्थसंकल्प मांडायचे असतील तर मुख्यमंत्री राहा, पण अर्थमंत्री होऊ नका,” असा टोला लगावला. त्यावर प्रत्युत्तर देताना सिद्दरामय्या म्हणाले की, त्यांनी १९९४ मध्ये प्रथम अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडला आणि आतापर्यंत १७ वेळा अर्थसंकल्प सादर करून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे.
केंद्र-राज्य संबंधांवर बोलताना त्यांनी सांगितले की, “राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल तरच केंद्र मजबूत होते. २०२५-२६ मध्ये कर्नाटकने केंद्राला ५ लाख कोटींहून अधिक कर दिला, पण परतावा अत्यल्प मिळतो. अन्याय झाल्यास प्रश्न विचारणारच.”
विमान व हेलिकॉप्टर खर्चावर झालेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. “मी २०२३ पासून आतापर्यंत फक्त १२ कोटी रुपये खर्च केले, तर माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी २०२२-२३ मध्ये ३७ कोटी रुपये खर्च केले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर ८१४ कोटी रुपये खर्च झाल्याचाही उल्लेख करत, “काहीवेळा वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवास अपरिहार्य असतो,” असे सांगून त्यांनी आपली भूमिका समर्थित केली.
Belgaum Varta Belgaum Varta