राजू पोवार : व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान
निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी व व्यापाऱ्यांना ५० टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केली आहे. गुरुवारी (ता.२०) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, सलग दोन वर्षापासून लॉकडाऊन होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. अलीकडच्या काळात प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा विकेंड लॉकडाऊन होत असल्याने भाजीपाला विकणे व इतर कारणांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय बाजारपेठेत खरेदी केलेले भाजीपाला व्यापारी सलग दोन दिवस उचलत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. त्यापूर्वी हे संघटनेने शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते, घरफाळा, पाणीपट्टी, विज बिल माफ करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. पण अजूनही त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंत निवडणुका होऊन सभेसाठी हजारोंची गर्दी झाली होती. मात्र निवडणुका होताच नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात विकेंड लॉकडाऊन पाळायचा की नाही हे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी ठरवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी रयत संघटनेशी संपर्क साधल्यास संघटना त्यांच्या पाठीशी राहील. तसेच शेतकरी व सामान्य व्यापाऱ्यांसाठी संघटना रस्त्यावर उतरण्यासाठी तयार असल्याचेही राजू पोवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी संघटनेचे निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, सेक्रेटरी भगवंत गायकवाड, बाळासाहेब हादिकर, बाळकृष्ण पाटील, तानाजी पाटील, सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, कलगोंडा कोटगे, बबन जामदार, सुभाष नाईक, राजू नाईक, शरद भोसले, चीनु कुळवमोडे, पांडुरंग तोडकर, बाळासाहेब कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.