संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : १०३ विद्यार्थ्यांना लाभ
निपाणी (वार्ता) : अरिहंत सौहार्द संस्थेच्या सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून अरिहंत शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. प्रत्येक वर्षी सुमारे शंभर ते दीडशेहून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या १०३ विद्यार्थ्यांना ३ लाख ३२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरण केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांनी शनिवारी (ता.१९) दिली. बोरगाव येथे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात ४८ शाखांद्वारे शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. सहा वर्षात गरीब व हुशार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. यावर्षी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १०३ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.
सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक व शिक्षण क्षेत्राला अरिहंत संस्थेने प्राधान्य दिले आहे. संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थी सेवेमुळे अरिहंत संस्था विविध योजना राबवित असल्याचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
संस्थेचे मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे यांनी, संस्थेच्या सभासदांशी मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या हेतूने संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील व संचालक मंडळाच्या निर्णयाने ही योजना राबविली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. यावर्षी दहावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ६० विद्यार्थी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, संचालक अभयकुमार करोले, जयपाल नागावे, पोपट पाटील, भुजगोंडा पाटील, जंबू बल्लोळे, शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माजी नगराध्यक्ष संगप्पा एदमाळे, प्रकाश जंगटे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक अजित कांबळे यांनी आभार मानले.