सी. टी. रवि यांना अटक करण्याची मागणी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांच्या नेतृत्वाखाली आज पोलिस ठाण्यावर मोर्चाने जाऊन पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांना राज्याचे गृहमंत्री आणि सी. टी. रवि यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातून राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना मंत्रीपदावरुन उच्चाटन आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रधान सचिव सी. टी. रवि यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यात जातीयवाद निर्माण करणाऱ्या गृह मंत्रीमहोदयांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रधान सचिव सी. टी. रवि हे जातीयवादाला खतपाणी घालून राज्यात सुव्यवस्था बिघडविण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी संकेश्वर घटक काॅंग्रेसने केली आहे. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी म्हणाले, कर्नाटक राज्यातील जनता जातीय सलोखा राखणारी आहे. राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी अर्धवट माहितीच्या आधारे चंद्रू खून प्रकरण चंद्रच्या उर्दू भाषा बोलण्यातून झाल्याचे सांगून जातीयवाद निर्माण करण्याचे कार्य केले आहे. नंतर त्यांनी आपण तसे सांगितले नसल्याचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे सी. टी. रवि यांचे वक्तव्य हिंदू-मुस्लिम, कन्नड-मराठी भाषावाद आणि जातीयवाद निर्माण करणारे असल्याने त्यांचेवर पोलीस कारवाई करण्याची मागणी करीत असल्याचे सांगितले.
काॅंग्रेसचे नेते दिलीप होसमनी म्हणाले, कर्नाटकात काॅंग्रेसची सत्ता असताना सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आले होते. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर जातीयवाद निर्माण करण्याचे काम गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, भाजपाचे राष्ट्रीय प्रधान सचिव सी. टी. रवि सारखे नेते करताहेत. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात सुव्यवस्था बिघडविण्याचे कार्य करणाऱ्या गृहमंत्रींना उच्चाटन करण्याबरोबर सी. टी. रवि यांना अटक करण्याचा आदेश देण्याची मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे सांगितले.
संकेश्वर पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांना निवेदन सादर करताना संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, महेश हट्टीहोळी, दिलीप होसमनी, बसनगौडा पाटील, अविनाश नलवडे, निलेश जाधव, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, प्रशांत कोळी, मुस्तफा मकांनदार, रियाज फणीबंद, बाबू भूसगोळ, संतोष सत्यनाईक, शंकर भोसले, युवराज पात्रोट, पिंटू सुर्यवंशी, काॅंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.